शुक्रवार, ३० जुलै, २०१०

वरदान



काय हे गोविंदा
वैकुंठनायका
वरदान देतो
पुन्हा माघारीही घेतो

तुझ्यासाठी जीव माझा
अटीतटी येतो
मोक्षालाही सोडून
मी पुन्हा जन्म घेतो

पुन्हा जातेवेळी
तूच माझ्यापुढे येतो
तुझ्याच भोवती
माझा जीव गोळा होतो

शतजन्म माझे
तुझ्यावर ओवाळतो
मुक्तीचे ते काय मोल
भक्ति मी मागतो

देवा तुझ्या संगतीत
कृतार्थ मी होतो
तुझे गीत गातो
आणि तुलाच पहातो

शनिवार, २४ जुलै, २०१०

मीलन



आपुला उदय अस्तु
कदा न जाणे चंडांशु
टळटळीत प्रकाशु
उरला आता

अंशत्वासी विसरला
तेणे समुद्र प्राशिला
तो जळपणे उरला
स्वरुपानंदी

शिष्यत्व गुरुतत्वात
समरसे नुरे द्वैत
अवघे परमात्म्यात
विलीन झाले

कोणी कोणा काय देणे
कोणी कोठे केव्हा जाणे
समाधिसुखे बैसणे
मोक्षाच्या ठायी

जे बुद्धि बोध बापुडे
प्रपंचात दुरावले
सद्गुरुकृपे भेटले
कैवल्यग्रामी

मंगळवार, २० जुलै, २०१०

ठेवा



कधी धर्म कधी भाषा
कधी जात कधी पेशा
किती बहाण्यांनी
माणूस फाड़ता
ज़रा तरी लाज
बाळगा हो आता
पुरे झाले पाप
दुही पेरण्याचे
जोड़ा काळजांना
दुवे भावनांचे
एकीचा दीपक
पेटवाल कधी
दु:खाचा काळोख
विझवाल कधी
तुमच्या दारात
रोज उगवतो
द्यायला मी दान
स्वत:हून येतो
फाटका पदर
तुमचा हा शिवा
प्रकाशाचे दान
स्वीकारा हा ठेवा

समर्थ



सुखी रहा बाळांनो
एवढे आहे मागत
तुम्हाला सोडून नाही
मजला सुख अन्य कशात

आहे माझ्या पदराला
बळ आभाळाच्या इतके
आभाळ ठेंगणे होते
जेव्हा तुम्हांस पहाते

मी वा-याशी भांडते
तुमचा कैवार मी घेते
मागणे तुम्हाला इतके
की रहा खेळते हसते

मी पहाडसुद्धा होते
संकटास मी थोपविते
मी लोळ विजेचा होते
दु:खावरती कोसळते

भिऊ नका आहे पाठीशी
मी समर्थ आहे आई
तत्पर तुमच्या हाकेला
मी सदा धावुनी येते

मी सर्वांची माउली
सांगते तुम्हा सर्वांना
उतमात करू नका कधी
मी सुख सगळ्यांना देते

प्रेम



तुज प्रार्थितो मी सद्गुरु अवधारी
नेई सुपंथे भवपैलतीरी
अज्ञानी बाळास काही कळेना
परि माउली तू विसरु नको ना

तुजविन मज कोणी नाही कृपाळा
धरी राग कैसा आपुल्याच बाळा
अपराध माझा जरी काही झाला
क्षमा करुनी पोटात घाला

चुकतो पुन्हा मी मज बुद्धि नाही
मज सावरुनी तू जवळी घेई
रे मी भुकेला मज ज्ञान देई
ते प्रेम पिउनी मी धन्य होई

माझा राम




माझा राम माझा राम
राम जगतजीवन
माझा राम माझा राम
राम पतितपावन

माझ्या रामा तुझा छंद
तुझे मला वेड जड़े
फुटे उरात पाझर
येरे येरे माझ्याकडे

मला सोडून कधीही
जाऊ नको माझ्या रामा
माझा जीव टांगणीला
लागे तुझ्याविना रामा

माझ्या रामा तुझे रूप
घ्यावे डोळ्यात भरून
काय करावे मावेना
राही नजर ठरुन

माझ्या रामा माझ्या रामा
तूच माझे पंचप्राण
माझ्या काळीज कुपीत
रहा सदैव दडून

ॐ राम कृष्ण हरि ॐ



माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.